पुणे : ‘जीवनांत संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्कारांशिवाय जीवन भरकटलेल्या जहाजांप्रमाणे असते,’ असे प्रतिपादन चिन्मया मिशनचे स्वामी सिद्धेशनंदा यांनी केले.
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल व गोयल गंगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेशनंदा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गंगा लेजंडच्या ‘अथ’ या प्रकल्पस्थळी हा कार्यक्रम पार पडला. चांगल्या विचारांचे आदनप्रदान व्हावे या उद्देशाने, विविध व्याख्यान, चर्चासत्र व उपक्रमांचे फाउंडेशनतर्फे आयोजन करण्यात येते.
सिद्धेशनंदा म्हणाले की, ‘दिवसेंदिवस पाल्य आणि पालक यांतील नाते अधिक नाजूक होत आहे. आपले आयुष्य जगण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडून आल्यामुळे आता शिक्षणाचे मोजमाप हे परीक्षेतील गुण आणि सुखाचे मोजमाप पैसा हे असे गणले जात आहे. त्यामुळे आयुष्यातील तणाव, त्यातच मुलांना हवे असणारे स्वातंत्र्य, पालक आणि पाल्य यांना वेढलेले सोशल मीडियाचे जाळे यामध्ये मुले व पालक यांच्या नात्याचे बंध कमकुवत झाले आहे की असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे.’
या वेळी गोयल गंगा फाउंडेशच्या गीता जयप्रकाश गोयल, सोनू गुप्ता, अरूण गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पालक, शिक्षक व फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.